Weather Alert: हवामान अपडेट पाहा आणि मगच घर सोडा, महाराष्ट्रावर दुहेरी संकट, रविवारी अलर्ट
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठ्या बदलांची शक्यता आहे. 26 एप्रिलचं हवामान अपडेट जाणून घेऊ.


महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट कायम असून बहुतांश भागात सूर्य आग ओकत असल्याची स्थिती आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रासारख्या आतील भागात कमाल तापमान 40-44 अंशांपर्यंत पोहोचू शकतो, तर किनारी भागात हवामान उष्ण आणि दमट राहील. काही भागांत वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता आहे. 26 एप्रिलचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील. या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. उकाडा हैराण करणारा असून कमाल तापमान 33-38 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता कमी आहे.
उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. आज विशेष अलर्ट नसला तरी उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. कमाल तापमानाचा पारा 38-42 अंशांवर जाईल. तुरळक ठिकाणी हलका वादळी पाऊस होऊ शकतो. परंतु, कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही.
पुढील 24 तास मध्य महाराष्ट्रावरील अवकाळी संकट कायम आहे. आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर पाचही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र, सोलापूर आणि सांगलीला 24 तासांसाठी यलो अलर्ट असेल. या काळात वादळी वारा आणि विजांसह पाऊस होईल. कमाल तापमान 38-42 अंशांपर्यंत असेल.
मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वारे वाहू शकतात. उर्वरित मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.कमाल तापमान 40-43 अंशांच्या दरम्यान राहील. सोमवारपासून हवामानात मोठे बदल जाणवणार आहेत.
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. कमाल तापमान 41-45 अंशांपर्यंत गेलं आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा सारख्या जिल्ह्यांत अक्षरश: होरपळून काढणारं ऊन आहे. हवामान मुख्यत: कोरडे राहील. मात्र, काही ठिकाणी वादळी वारे आणि तुरळक पावसाचा अंदाज आहे. नागपूरसारख्या ठिकाणी तापमान 44 अंशांच्या घरात जाईल.
दरम्यान, महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा, तर 5 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 4 जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा धोका आहे. सोमवारपासून पुन्हा मोठ्या हवामान बदलांची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.



