
एकंदरीत, महाराष्ट्रात सोमवारपासून उष्णतेची लाट येण्याचा धोका आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 4 घराबाहेर जाणे टाळावे.

महाराष्ट्रात एप्रिलअखेर हवामानात पुन्हा मोठ्या बदलांची शक्यता आहे. अवकाळी संकटाचा धोका कमी झाला असला तरी सूर्य आग ओकत असल्याची स्थिती आहे. कमाल तापमानाचा पारा 40-44 अंशांपर्यंत गेला आहे. अशातच 27 एप्रिलसाठी हवामान विभागाने धोक्याचा अलर्ट जारी केला आहे. विदर्भात होरपळून काढणारी उष्णतेची लाट येणार असून 3 जिल्ह्यांना ऑरेंज तर 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.
कोकणात गेल्या काही काळापासून उष्ण आणि दमट हवामान स्थिती कायम आहे. आता सोमवारी अवकाळीचा कोणताही धोका नाही. मुंबईसह संपूर्ण कोकणात कमाल तापमाचा पारा 32-35 अंशांवर राहील. मुंबई-ठाणे परिसरात घामटा निघणार असून अस्वस्थता जाणवू शकते.
मध्य महाराष्ट्रावरचं अवकाळी संकट टळलं आहे. सोमवारी हवामान कोरडे आणि स्वच्छ राहील. मात्र तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान 38-42 अंशापर्यंत जाईल. रात्री देखील 22-26 अंशांपर्यंत तापमान राहणार आहे. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवेल.
मराठवाड्यात अंगाची लाहीलाही करणारं ऊन जाणवेल. हवामान कोरडे राहणार असून तापमानाचा पारा पुन्हा चढणार आहे. कमाल तापमान 39-43 अंशांपर्यंत राहील. तर रात्रीचा पारा 23-27 अंशांपर्यंत राहील. सोमवारपासून पुढील काही दिवस पावसाची कोणतीही शक्यता नाही. उष्णता जास्त राहील.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आदी भागात उष्णतेचा पारा चांगलाच चढला आहे. हवामान कोरडे आणि उष्ण राहील. कमाल तापमान 39-43 अंशांपर्यंत राहील. उष्णतेचा चटका जाणवेल. पावसाची कोणतीही शक्यता नाही.
एकंदरीत, महाराष्ट्रात सोमवारपासून उष्णतेची लाट येण्याचा धोका आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 4 घराबाहेर जाणे टाळावे. 27 एप्रिलला राज्यात हवामान कोरडे राहील. तर 28 एप्रिलपासून विदर्भात पुन्हा अवकाळी पाऊस सक्रीय होण्याची शक्यता आहे.



